Features

जीजीभॉय यांची शपथ आहे !

गेले काही दिवस जेजेच्या डिनोव्हो प्रक्रियेवर जाणून बुजून आरोपांचे संभ्रम निर्माण केले जात आहेत. काही वृत्तपत्रं तर हेतुपुस्सर जेजेच्या डिनोव्हो स्टेटसविषयी चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. पण शासनाचा जीआर जाहीर झाल्यामुळे या आरोपातील हवाच निघून गेली आहे. या सगळ्या वादावर जेजेचे माजी विद्यार्थी आणि डिनोव्हो चळवळीतले खंदे कार्यकर्ते आशुतोष आपटे यांनी लिहिलेला हा काव्यात्मक लेख.

शासनाचा जी आर आला.
जे. जे. डिनोव्होविषयीचे सगळे खोटे आरोप धुवून निघाले…
पण…
पण जे जे विषयीची काही जणांची असुया …
काहींनी मुद्दामहून पांघरलेले पांघरूण..
काहींना अज्ञान असुनही असलेला अहंकार
त्याच्यावर काही तोडगा नाही…
जीजीभॉय माफ करा त्यांना..
बालक है… क्षमा करे..

काहींनी फार म्हणजे फार तारे तोडले
काही म्हणाले आम्ही आधी खाजगीकरण होणार, फी वाढणार वगैरे बातमी दिली होती म्हणून सरकारने सारवासारव केली..
काही अति सन्माननीय ( काही स्वयंघोषित सन्माननीय असतात. बाहेर कुत्रा विचारायचे सोडा भुंकत पण नसेल) तर म्हणाले,
“जेजे च्या कंपनीतली माणसे मंत्रीच निवडणार..
मग १५ ते ५० विद्यार्थ्यांसाठी पब्लिकचे पन्नास कोटी कशाला देतात. सब गोलमाल है ”
असे म्हणणारे हे तर स्वतःला विद्वान समजत असणार,
पण यांना कोणी विचारत नाही..
जेजे डिनोव्हो तर होते आहे..
मग पोटशूळ उठणारच नं…
अहो सन्माननीय भाऊ,
जेजे आधीही सरकारचंच होतं
आता जेजे च्या नावाची सरकारी कंपनी केली..
खाजगी नाही..
कंपनी सेक्शन आठच्या कायद्यांतर्गत सरकारनेच रजिस्टर केली..
आणि त्या कंपनीच्या अखत्यारीत
म्हणजे सरकारच जेजेचे पालक असणार आहेत..
मग खर्च सरकारच करणार नं..
बरं जे पन्नास कोटींच्यावर पैसे
वेतन व वेतनर खर्चासाठी मंजूर
केले व दरवर्षी अशी ग्रांट सरकार देतच राहणार..
यात काय वावगे आहे…
सरकारी ग्रांट चालू आहे
म्हणजेच वाट्टेल तशी फी वाढ संभवतच नाही..
शिवाय फी माफी, सवलतीच्या योजना चालूच राहणार…
यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील
सर्व समाजातील सामान्य विद्यार्थीही
जेजे सारख्या सर्वात चांगल्या
कला महाविद्यालयात
डिनोव्हो या उच्च दर्जाच्या कला शिक्षणाचा लाभ
सहज घेऊ शकेल…
मग काय बिघडले?
चांगले शिक्षण सरकारने
कमी फी मध्ये दिले
तर यांच्या खाजगी कॉलेजला कोण विचारणार?
गोलमाल हा आहे..
हं…
आणि काही ते हट्टी पेपरवाले
म्हणजे यांची वृत्तपत्रे खरेच चांगली आहेत
पण हे काही बातमीदार
बहुदा आपण सर्वज्ञ आहोत,
आपण दोन्ही बाजू न्यायाने बघून लिहीतो
वगैरे वगैरे स्वतःलाच समजवतात…
वास्तविक काही लोक
आरशात भांग पाडताना सुध्दा
भांगेत असतात…
पण त्यांना वाटते आपण
न्यायप्रिय अभ्यासु
पुराव्यानिशी बोलणारे वगैरे आहोत म्हणून…
आता त्याला आपण काय करणार?
ते म्हणतात फी वाढणार
त्याचा पुरावा आहे म्हणून
काय पुरावा?
तर म्हणे युजीसीला
कोणीतरी कधीकाळी दिलेला ड्राफ्ट…
अरे सोन्या,
तारीख सांग ना त्या प्रस्तावाची…
बरं आपण म्हंटले समजा फी जास्त घ्यावी लागणार…
बरोबर आहे..
पण माझ्या लाडक्या
शासन स्पॉन्सरर आहे. असणारच आहे.
तसा जी. आर. ही काढला आहे.
मुळात आत्ता सुध्दा
जेजेचा खर्च काढला तर
दर डोई
प्रत्येक विद्यार्थ्याला सव्वा लाख रुपये तरी फी बसेल.
पण प्रत्यक्षात विद्यार्थ्याला
सात साडेसात हजार रुपयेच भरायला लागतात..
कारण बाकी फी
सरकार ग्रांटच्या स्वरूपात स्पॉन्सर करते…
पुढे समजा फी म्हणजे
दरडोई खर्च वाढला
तरी ग्रांटही वाढेल..
म्हणजेच प्रत्यक्षात विद्यार्थ्याला
फी कमीच भरावी लागेल
शिवाय सरकारी नियमानुसार
सवलती, फ्री शिप, स्कॉलरशिप असणारच…
पण हा विचार
आमचा प्रिय हट्टी बातमीदार
करतच नाही नं…

पण किती निखालस खोटेपणा हा?
हे बातमीदार अज्ञानातून, कुठे कोणी मॅनेज केले म्हणून, की उच्च कोटीचे काही औषधी पदार्थाचे सेवन करुन त्या अमलाखाली बातम्या देतात की काय?
मुळात या आमच्या जे. जे. डिनोव्होच्या आंदोलनाला मा. सुप्रिया ताई सुळे, मा. जयंतराव पाटील यांनी पाठिंबा तर दिलाच होता शिवाय राजकीय/शासकीय पातळीवर प्रत्यक्ष मदतही केली होती. सामन्याचे सर्वेसर्वा, तत्कालीन मुख्यमंत्री व आमचे जेजेतले स्नेही मा. उद्धवजी ठाकरे यांनी तेव्हा मुख्यमंत्री म्हणून डिनोव्होच्या प्रस्तावावर सही केली होती. शिवसेनेचे मा. खासदार अनिलजी देसाई स्वतः आमच्याबरोबरीने उद्धवजी व तत्कालीन शिक्षणमंत्री मा. उदयजी सामंत यांच्याबरोबरच्या अधिकृत बैठकीला उपस्थित होते. मा. उदय सामंत यांना अनेकांनी खोटे नाटे सांगुन जेजे डिनोव्हो विरुद्ध कान भरवण्याचा प्रयत्न केला.. पण सत्य परिस्थिती लक्षात येताच त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. डिनोव्होचा निर्णय लवकर व्हावा म्हणून मा. उदयजींनीच स्वतःच्या सहीने दोन पत्रे केंद्रातील संबंधित यंत्रणेला पाठविली होती. मा. आदित्य ठाकरे यांनीही या संदर्भात खूप मदत केली.
महाराष्ट्राच्या आजच्या शिक्षण मंत्र्यांनी, मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी तर हिरीरीने पुढाकार घेऊन, जेजेची नाव डिनोव्होच्या तिराला लावलीच. केंद्रीय शिक्षण मंत्री मा. धर्मेंद्रजीही पूर्ण डिनोव्होच्याच बाजुने होते व आहेत. स्वतः आय. ए. एस. ऑफिसर व शिक्षण सचिव मा. रस्तोगी या निर्णय प्रक्रियेत डिनोव्होच्या बाजुने सकारात्मकरित्या सहभागी होते. टास्क फोर्सचे अध्यक्ष आय. ए. एस. अधिकारी डॉ.निपुण विनायक, माजी कुलगुरू मा. विजय जोशी हेही डिनोव्होसाठीच सक्रिय होते. गेला बाजार आमच्या जे. जे. चे अधिष्ठाता व माझे डीप. ए. एडचे वर्गमित्र मा. प्रा. विश्वनाथ साबळे हे स्वतः जेजे च्या आणि कलाशिक्षणाच्या भल्यासाठी प्रसंगी त्यांच्या राज्य विद्यापीठ करु जाणाऱ्या मित्रांना सोडून न बोलता डिनोव्होच्याच बाजुला कायम होते. (साबळेसरांचा कला संचालक म्हणून सत्कार करताना त्यांच्या काही सज्जन मित्रांनी डिनोव्होच्या विरुद्ध भर सभेत कांगावा केला होता. पण साबळेसरांनी न बोलता, त्यांना बाजूला ठेवून डिनोव्होच्याच बाजुने कौल दिला)
सरकारच्या राज्य विद्यापीठ व्हावे या समितीतले ज्येष्ठ आर्किटेक्ट मा. शशी प्रभू व आणखी इतरही अनेक सदस्य राज्य विद्यापीठ नव्हे तर डिनोव्होच्या बाजुनेच होते.
आय. सी. टी. चे रसायन शास्त्रज्ञ पद्मश्री गणपती यादव ठामपणे आमच्या पाठीशी राहून आम्हाला मदत करत होते.
अहो साहेब चार पाच वर्षांपासून
काही आय. ए. एस. अधिकारी
जेजेतील काही शिक्षक
अक्षरशः परिश्रम घेऊन,
जेजेला डिनोव्होचा दर्जा मिळावा म्हणून
दिवसरात्र मेहनत करत होते..
किंबहुना आय. ए. एस. अधिकाऱ्यांनीच सल्ला दिला
जेजेचे भले करायचे असेल
तर डिनोव्हो करा म्हणून..!
सुरुवातीला मा. विनोदजी तावडे यांनी सकारात्मक सुरुवात केली होती..
केंद्रातून आमचा जेजेचा माजी विद्यार्थी व प्रख्यात अभिनेता,
आमचा जुना जिवश्च कंठश्च दोस्त
पद्मश्री मनोज जोशी
केंद्रात आणि राज्य सरकारात
कायम डिनोव्होचा झेंडा घेऊन
लढत होता.
स्वत: जीजीभॉय यांचे पणतू
मा. रुस्तमजी म्हणतात,
हे माझ्या
पणजोबांनी स्थापन केलेले
आर्ट कॉलेज आहे आणि ते समृध्द करायचे तर डिनोव्हो शिवाय पर्याय नाही…!
ते पुढे म्हणत, जेजे डिनोव्होसाठी कुठेही यायचे झाले तर सांगा..
मी तुमच्या बरोबर आहे.

नंतर आम्ही जेजेचे अनेक माजी विद्यार्थी
आमच्या जेजेसाठी,
महाराष्ट्रातील भावी पिढ्यांना
योग्य फी मध्ये,
सरकारी छत्राखाली सुरक्षित
पण भारतातील सर्वात
उच्च दर्जाचे खरे आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून
निस्वार्थीपणे
जेजे डिनोव्होच्या लढ्यात उतरलो…
मग आता सांगा
ही सगळी मंडळी जेजेचे खाजगीकरण व फी वाढ होत असती तर डिनोव्होच्या बाजुने उभी राहिली असती का?
पण नाही सारासार विचारही करायचा नाही.. आपण ज्या सन्मानिय व सुप्रसिद्ध पेपरात फुटकळ बातम्या, वृतांत वगैरे लिहीतो तेव्हा निदान आपलेच वरीष्ठ डिनोव्होच्या म्हणजे न्यायाच्या बाजुचे आहेत एवढे तरी तपासायचे ना…!
नाहीतर तुम्ही त्यांनाच भ्रष्ट ठरवता आहात असा अर्थ निघू शकतो हो..!
नका ना असे करु.. ! !

असो, झाले ते होऊन गेले, लिहुन मोकळा झालात ..
पण तुम्ही बातमी छापलीत,
सूर्य उगवणार नाही म्हणून,
तर सूर्य उगवायचा थांबणार आहे का?
वरुन मखलाशी करायची बघा, आम्ही छापलं होतं सूर्य उगवणार नाही….
म्हणून शेवटी सूर्याने एकदाचे उगवून सारवासारव केली..
असे म्हणता…
किती कित्ती छान विनोद करता नं तुम्ही…
पण अशा मखलाशी बातमीदार मित्रांनो,
जरा सावध व्हा.. काहीतरी अभ्यास बिभ्यास करुन लिहा.
नाहीतर पीटीआयच्या बातम्या लिहुन रिकामे रकाने भरणारे क्षुल्लक बातमीदारच राहाल तुम्ही..
कसं असतं.. वृत्तपत्रांना मथळ्याचे स्वातंत्र्य असते..
त्याचा गैरफायदा घेत काही बातमीदार मुद्दाम संभ्रम निर्मिणारे लिहतात
पण ही एक प्रकारची पित पत्रकारिताच आहे…! !
( पत्रकारिता हा शब्दप्रयोग तुमच्यासाठी नाही पण वाक्य प्रयोग म्हणून करावा लागला आहे. क्षमस्व)
मात्र
जेजेवाल्यांनो,
डिनोव्हो होते आहे
हे सुखद आहेच…
पण आता आपली जबाबदारी वाढली आहे…
स्वराज्य मिळाले
पण ते सुराज्यही झाले पाहिजे…
यासाठी आपण सर्वांनी
एक जेजे
या संपूर्ण जेजेच्या आजी माजी विद्यार्थी संघटनेनी
जेजे च्या भल्यासाठी
इथे चांगलेच शिक्षक येवोत म्हणून
इथे कसदारच शिक्षण मिळो म्हणून
कायम बारीक लक्ष ठेवले पाहिजे
आणि जेजे साठी काहीही
कोणत्याही स्तरावरची
सक्षम मदत तत्पर पुरवण्याची
तयारी ठेवली पाहिजे…
जेजेवाल्यांनो अभिनंदन
आणि आपल्या सर्वांना
जीजीभॉय यांची शपथ आहे !

******
– आशुतोष राम आपटे

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.